अति तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान, घोडसगाव व अंतुर्ली मंडळांचा समावेश करा –
आ.चंद्रकांत पाटील
नुकत्याच एप्रिल व मे २०२४ महिन्याच्या अति तामानामुळे पिक विम्यासाठी पात्र असलेल्या महसूल मंडळांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव व अंतुर्ली ही दोघे मंडळे नोंदी घेणाऱ्या खासगी कंपनीच्या चुकीमुळे समाविष्ट समाविष्ट झाली नसल्याने सदरील १०० % केळी पट्ट्यातील ही मंडळे तात्काळ पिक विम्यासाठी पात्र ठरवावी अशा मागणीचे पत्र आ.चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना E mail द्वारे पाठविले असून संबंधितांशी बोलताना भ्रमणध्वनिवरून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.
आमदारांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, जिल्ह्यात एप्रिल व मे २०२४ या कालावधीत उष्णतेच्या लाटांमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. अति तापमानामुळे केळी बागांना फटका बसला होता. दरम्यान एप्रिल महिन्याच्या अति तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील ७५ महसूल मंडळे व मे महिन्याच्या अति तापमानाच्या निकषात ५१ महसूल मंडळे हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत Skymet Weather Services या खासगी कंपनीने घेतलेल्या अति तापमानाच्या नोंदींच्या आधारे पात्र ठरविण्यात आली आहे. परंतु माझ्या मतदार संघातील मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव व अंतुर्ली या दोन महसूल मंडळांमध्ये १००% केळी उत्पादक शेतकरी असून या मंडळांमध्येही सलग ५ दिवस तापमान हे ४५’ अंशापेक्षा वर गेल्यामुळे हि मंडळे सुद्धा निकषात बसून केळी पिक विम्यासाठी पात्र असतांना वर नमूद कंपनीच्या हलगर्जीपणामुळे व अति तापमानाच्या व्यवस्थित नोंदी न घेतल्यामुळे या दोनही मंडळातील शेतकरी केळी पिकाचे नुकसान होऊन सुद्धा या हवामान आधारित फळपिक योजनेतील पिक विम्याच्या नुकसान भरपाई मिळणेस वंचित ठरलेले असून शेतकरी वर्गात प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली आहे.
त्यामूळे एप्रिल व मे २०२४ महिन्याच्या अति तामानामुळे पिक विम्यासाठी पात्र असलेल्या महसूल मंडळांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव व अंतुर्ली मंडळे समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी आ.चंद्रकांत पाटलांनी केली आहे .