नाशिक, 3 मार्च (हिं.स.)।
महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली ते बिहार मधील बुद्धगया जगातील सर्व बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांचे आहे.महाबोधी टेम्पल कायदा रद्द करून महाबोधी महाविहारच्या व्यवस्थापन समिती मध्ये सर्व विश्वस्त बौद्ध धम्माचे नियुक्त करावेत.महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या हा आज ऐतिहासिक धम्म परिषदेत मंजूर ठराव बिहारच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कळवणार आहे.तसेच लवकरच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्याचा आपला निर्धार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
अडीच हजार वर्षांपुर्वी भगवान गौतम बुद्धांनी भारतात लोकशाहीचा पाया रचला. जगाला शांतीचा विचार दिला. हाच विचार जगातील सर्वच मोठ्या देशांमध्ये रुजला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच लोकशाहीचे प्रतिक असून त्यांनी संविधानाची निर्मिती केली आहे. संविधानाला हात लावण्याची कोणाची हिंमत नाही, पण कोणी हात लावल्यास त्याला सोडणार नाही, असा इशारा आठवले यांनी दिला.
श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या 95 व्या वर्धापन दिनानिमित्त देश-विदेशातील भिक्खु संघाच्या अनुयायांच्या उपस्थितीत नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदानावर बौध्द धम्म परिषद रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रामदास आठवले आणि यांच्या पत्नी सीमाताई आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
बुध्दगया येथे भगवान बुध्दांना ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानच जगात श्रेष्ठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाचीच प्राप्ती केली म्हणून त्यांना संविधान लिहिण्याचा अधिकार मिळाला. 2 मार्च 1930 रोजी बाबासाहेबांनी काळाराम सत्याग्रह केला, मंदिर प्रवेशासाठी ते लढत नव्हते तर संपूर्ण मानव जातीच्या हक्कासाठी ते लढत होते. त्याकाळी दलिताना काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला नाही. मात्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीमुळे आज मला काळाराम मंदिरात मानाने प्रवेश करण्याची संधी मिळाली . पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे यावेळी आभार मानले. बँकॉक पट्टाया च्या धर्तीवर नाशिकमध्ये सुद्धा एखाद्या डोंगरावर भगवान बुद्धांची मूर्ती कोरून बौद्ध पर्यटन स्थळ उभारण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, अशी सूचना रामदास आठवले यांनी यावेळी केली.