सोलापूर, 14 मार्च (हिं.स.)।
अल्पावधीत रासायनिक लेपन परत करावे लागल्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेल्या रासायनिक लेपनास मंदिर महासंघ, वारकरी यांचा तीव्र विरोध आहे,” अशी भूमिका मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी मांडली आहे.
श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरे तर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले. ते करण्यात आले तेव्हाच पुढे ८ ते १० वर्ष त्याला काही होणार नाही, असे सांगण्यात आले होते. असे होते, तर ४ वर्षापूर्वीच लेपन केलेले असताना ते परत परत का करावे लागते? लेपन ४ वर्षांतच करावे लागते याचा अर्थ ‘यापूर्वीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले’,
असेच म्हणावे लागेल. खरे पहाता देवतेच्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारे रासायनिक लेपन करणे, ही पूर्णतः धर्मशास्त्रविसंगत कृती आहे. मुळापासून उपाययोजना न काढता रासायनिक लेपनासारखी वरवरची उपाययोजना काढल्याने देवतेच्या मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतात, हेही ध्यानात घ्यायला हवे. त्यामुळे रासायनिक लेपनास मंदिर महासंघ आणि वारकरी यांचा तीव्र विरोध आहे.