बुलढाणा , 13 मार्च (हिं.स.)।बुलढाण्यातील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त तरुणाने सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या तालुक्यात घडली आहे. कैलास नागरे असं या युवा शेतकऱ्याचं नाव आहे.शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. माझ्या आत्महत्येस सरकार कारणीभूत असल्याचं कैलास नागरे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील प्रगतीशील आणि राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आज(दि. १३) सकाळी आत्महत्या केली. त्यांनी त्यांच्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चार पानी सुसाईड नोटही लिहून ठेवली.
कैलास नागरे हा युवा शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं, यासाठी लढा देत होता. डिसेंबर महिन्यात त्यांनी दहा दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते.विशेष म्हणजे आंदोलनानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी कैलास नागरे यांना पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासनही दिले होते. परंतु मार्च महिना उजाडला तरी ही मागणी मान्य न करण्यात आल्याने आणि परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत आहे, असे सुसाईड नोटमध्ये नमूद करत त्यांनी जीवन संपवले.
कैलास नागरे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय की, “आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत. परंतु तरीही पाणी येत नाही. माझ्यावर आता केळी आणि पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा व राख आनंदस्वामी धरणात टाका. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावं. माझ्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो… स्वतः शून्य झालो.”
दरम्यान, आधुनिक पद्धतीने शेती करण्याची आवड असलेला आणि राज्य सरकारने पुरस्कार देऊन गौरन्वित केलेल्या शेतकऱ्यानेच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन दिवंगत कैलास नागरे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत शेतातून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना नेऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला. घटनास्थळी मोठ्या संख्येने शेतकरी जमले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे आणि शोकाचे वातावरण पसरले आहे.