लाहोर , 10 मार्च (हिं.स.)।दुबईत रंगलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारतीय संघानं दिमाखदार कामगिरी करत विक्रमी ट्रॉफी आपल्या नावे केली. या फायनलनंतर अगदी थाटात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं ट्रॉफी उंचावली. पण रोहित शर्माला ट्रॉफी उचलताना पाहिल्यावर पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर आणि माजी गोलंदाजानं मोठा प्रश्न उपस्थितीत केला आहे.भारतीय संघानं ट्रॉफी जिंकल्यावर शोएब अख्तरनं आपल्या एक्स अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. यातून त्याने जो प्रश्न उपस्थितीत केलाय तो नव्या वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
एका बाजूला टीम इंडियासह क्रिकेट चाहते विजयाचा जल्लोष साजरा करत असताना दुसरीकडे शोएब अख्तरनं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रेझेन्टेशन दरम्यान जे दृश्य दिसलं, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याने यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केलीये. एक्स अकाउंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, भारतीय संघानं आयसीसी ट्रॉफी जिंकलीये. प्रेझेन्टेशन वेळी मी एक अजब गजब गोष्ट पाहिली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील एकही व्यक्ती मला स्टेजवर दिसली नाही. ही गोष्ट माझ्या समजण्यापलिकडची आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धेचे यजमानपद मिरवत असताना, असे कसे होऊ शकते? असा प्रश्न उपस्थितीत करत त्याने नाराजी व्यक्त केलीये. या गोष्टीचा विचार करायला हवा, असा उल्लेखही त्याने आपल्या व्हिडिओमध्ये केलाय.
यानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने आपल्या युट्यूब चॅनेलवरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या अनुपस्थितीसंदर्भात मोठी माहिती दिलीये. तब्येत ठिक नसल्यामुळे ते फायनलसाठी दुबईत जाऊ शकलेले नाहीत, असे अक्रमनं म्हटलंय. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आलाय की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमेर अहमद आणि उस्मान वाला हे अधिकारी फायनलसाठी स्टेडियमवर उपस्थितीत होते. पण त्यांना व्यासपीठावर बोलवण्यात आले नाही. ही गोष्टच नव्या वादाचा मुद्दा ठरेल, अशीच आहे.