मुंबई , 5 मार्च (हिं.स.)।समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांच्याविरोधात विधिमंडळात निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्तान सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून आज, बुधवारी अबू आझमी यांना निलंबन करण्यात आले आहे. औरंगजेबसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अबू आझमींना निलंबित करण्यात आलं आहे.
मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभेमध्ये अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडताना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या विधानावरही कारवाई करण्याची मागणी केली. मात्र दोन्हीकडून आमदार आरडाओरड करु लागले आणि सभागृहामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.याचदरम्यान अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आवाजी मतदान घेतलं. या आवाजी मतदानामध्ये एकमताने ठराव मंजूर झाल्याचं जाहीर करत अबू आझमींचं निलंबनावर शिक्कामोर्तब केलं आहे. अबू आझमी यांना आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होता येणार नाही. अधिवेशन कालावधी संपेपर्यंत अबू आझमींवर विधानसभेच्या इमारतीच्या आवारात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कोतुक करत वादग्रस्त विधान केले होते. “औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती. जीडीपी २४ टक्के होता. हे सर्व मी चुकीचे म्हणू का?” असा प्रश्न करत, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई सत्तेसाठी होती. धर्मासाठी नव्हती,” असे अबू आझमी यांनी म्हटले होते. आझींच्या या विधानाचे पडसाद मंगळवारी विधानसभेत बघायला मिळाले. ‘अबू आझमींना निलंबित करण्याची आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती.मागील तीन दिवसांपासून विधानसभेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर अबू आझमी यांच्याविरोधात दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.आज अखेर अबू आझमी यांना निलंबित करण्यात आले.
एकनाथ शिंदेंनी कारवाईची मागणी केल्यानंतर मंगळवारी अबू आझमींनी आपल्या ट्विटरवरून स्पष्टीकरण देत आपलं विधान मागे घेतलं होतं. “माझ्या शब्दांना मोडून-तोडून दाखवण्यात आलं. औरंगजेबबद्दल मी तेच म्हटलं जे इतिहासकारांनी आणि लेखकांनी म्हटलं आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजा, छत्रपती संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल अपमानकारक विधान केलेलं नाही. मात्र तरीही माझ्या वक्तव्याने कोणी दुखावलं गेलं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. या विषयाला राजकीय वळण दिलं जात आहे. या कारणामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात अडथळा येणं हे महाराष्ट्राच्या लोकांचं नुकसान असल्याचे आझमी यांनी म्हंटले आहे.