कोल्हापूर, 7 मार्च (हिं.स.)।
एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो. शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांनी तत्कालीन समाज घडविण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. या दोघांनी नवीन समाजाची निर्मिती करण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले असल्याचे गौरोवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मौजे पैजारवाडी येथे शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांचे उभारण्यात आतेला अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर होते.
ते पुढे म्हणाले, शिक्षण हे व्यक्तीला घडविते. सुसंस्कृत समाज निर्मितीला सहाय्यभूत ठरते. या ठिकाणी उभारण्यात आलेले या दोन्ही मान्यवरांचे पुतळे समाजाला प्रेरणा देतील.
हिरवे गुरुजी यांनी कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यात 60 वर्षापूर्वी सुमारे 104 शाळांची तसेच एका वसतिगृहाची उभारणी केली. हे अतुलनीय कार्य समाज नक्कीच लक्षात ठेवेल. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याच्या आठवणीची जाणीव नवीन पिढीला व्हावी तसेच त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठीच या अर्धाकृती पुतळ्यांची उभारणी करण्यात आली असल्याचे आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पारंपारिक पद्धतीने धनगरी ढोल वाजवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रम समाप्तीनंतर मुख्यमंत्र्यांची परमपूज्य सदगुरु चिले महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.