सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी माहे मार्च ते जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादूर्भाव होत असतो. उष्माघातावर वेळीच उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास गंभीर स्वरुपात आजारी पडणे किंवा मृत्यु होण्याची शक्यता असते. त्यासाठी जागरुकपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या पाहिजे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रशासनाच्या स्तरावर रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्र स्तरावर प्रथमोपचार व उष्माघात नियंत्रणाच्या अनुषंगाने शितकक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली आहे. या विशेष कक्षांमध्ये आवश्यक औषधी,साहित्य सामग्री सुसज्ज ठेवण्यात आली आहे.
उष्माघात होण्याची कारणे –
१. उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फारवेळ करणे.
२. कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे.
३. जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे.
४. घट्ट कपड्यांचा वापर करणे.
अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
उष्माघाताची लक्षणे –
१. थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे.
२. भूक न-लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे.
३. रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी.
प्रतिबंधक उपाय –
१. वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे. (दुपारी १२ ते सायं.४ पर्यंत)
२. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावीत.
३. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंबा भडक रंगाची कपडे) वापरु नयेत, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.
४. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा वा उपरणे यांचा वापर करावा.
५. जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपुर प्यावे. सरबत प्यावे.
६. उन्हामध्ये काम करताना अधून-मधून सावलीत थोडीशी विश्रांती घ्यावी.
७. उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम थांबबावे.
प्रथमोपचार –
• रुग्णास हवेशीर खोलीत किंवा पंखे, कुलर्स सुरु असलेल्या खोलीत किंवा वातानुकुलीत खोलीत ठेवावे.
• रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.
• रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी.
• रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्या ठेवाव्यात, ऑईसपॅक लावावे.
• वैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यकतेप्रमाणे शीरेवाटे सलाईन द्यावी.
• उन्हामुळे त्रास जाणवल्यास आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी तात्काळ संपर्क साधून औषधोपचार घ्यावा.
नागरिकांनी तापमानातील वाढ व यामुळे उद्भवणाऱ्या उष्माघात सारख्या आरोग्य विषयक गंभीर समस्या टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.