अमरावती, 1 एप्रिल (हिं.स.)
अमरावतीतील २३ वर्षीय नावेद अब्दुल नईम या तरुणासाठी यंदाची ईद एक नवीन आशा घेऊन आली आहे. गेल्या काही वर्षांपासून तो ब्लड कॅन्सरशी (तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया) लढतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या तत्परतेने नावेदवर मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले असून, त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात पुढे न केला असता, तर कदाचित मी आज हसत बोलत आपल्यासमोर उभा राहू शकलो नसतो. त्यांनी आम्हाला खरी ईदी दिली असे भावनिक उद्वार नावेदने काढले.
२०२३ मध्ये पहिल्यांदा निदान झालेल्या या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने नावेदच्या कटुंबावर मोठे संकट आले. त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असून, ते अमरावतीतील एका कापड दुकानात काम करतात. तीन मुलींचे शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना नावेदच्या उपचारासाठी आवश्यक असलेले ३० ते ३५ लाख रुपये उभे करणे त्यांना अशक्यप्राय होते. उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कम ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर नावेदच्या वडिलांनी अमरावतीचे आमदार संजय खोडके व सुलभा खोडके यांच्याकडे धाव घेतली.
आमदारांनी परिस्थिती समजून घेत, त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे नावेदला तातडीने मदत मिळाली. मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख रुपये, टाटा ट्रस्टकडून १५ लाख रुपये, तर उर्वरित रक्कम धर्मादाय रुग्णालयाच्या मदतीतून कोकिलाबेन हॉस्पिटल आणि काही प्रमाणात सिद्धिविनायक ट्रस्टकडून मिळाली. या मदतीमुळे नावेदच्या उपचारांचा मार्ग सुकर झाला. मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नावेदवर अत्याधुनिक उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सध्या नावेदवर मिनी हायपर सीव्हीएडी किमोथेरपी आणि इतर औषधोपचार सुरू आहेत. त्याच्या २१ वर्षीय बहिणीची एचएलए जुळणी झाल्याने ती दाता म्हणून पात्र ठरली आहे. ४ एप्रिल रोजी तिच्या स्टेम सेल्स नावेदच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात येणार आहेत.