मुंबई, 20 मार्च (हिं.स.) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून, याअंतर्गत पूरक पोषण आहाराच्या दरांचे निर्धारण केंद्र शासनाकडून करण्यात येते. सध्या हा दर प्रति लाभार्थी प्रति दिन ८ रुपये इतका असून, २०१७ पासून यात कोणताही बदल झालेला नाही. दरवाढीच्या मागणीसाठी राज्य शासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव सादर केला असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य योगेश सागर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य रईस शेख यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबवण्यासाठी केंद्र व राज्याचा ५० टक्के निधी असतो. पूरक पोषणाचा २०१३ मध्ये दर प्रति लाभार्थी ६ रुपये होता, तर २०१७ मध्ये तो ८ रुपये करण्यात आला. राज्य सरकारने केंद्र शासनाकडे पूरक पोषण आहाराच्या चार रुपये दरवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला असून यासंदर्भात लवकरच निर्णय होईल. ही दरवाढ होईपर्यंत याबाबत तरतूद करण्यासाठी विभागामार्फत राज्य शासनास प्रस्ताव पाठवण्यात येईल. ग्राम बाल विकास केंद्रांच्या धर्तीवर नागरी भागातील अति तीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.