मुंबई, ६ मार्च (हिं.स.) – आम्ही अन्य भाषेचाही सन्मान करतो. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करू शकतो, तोच अन्यांच्या भाषेवर प्रेम करू शकतो. महाराष्ट्रात रहाणार्यांनी मराठी शिकले पाहिजे. महाराष्ट्रात रहाणार्यांना मराठी आले पाहिजे. रा.स्व.संघाचे भैय्याजी जोशी यांचेही याविषयी दुमत असेल, असे नाही, अशी राज्यशासनाची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथील एका कार्यक्रमात ‘महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे, असे नाही’, असे वक्तव्य केल्याचा संदर्भ दिला. भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मराठीचा अवमान करणारे असल्याचे नमूद करत याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी या वेळी भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली. त्यावर फडणवीस यांनी वरीलप्रमाणे भूमिका स्पष्ट केली.