सातारा , 3 एप्रिल (हिं.स.)।सातारा ते मुंबईदरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी अपघाताच्या ठिकाणी महामार्गावर आता नव्याने १९ ठिकाणी ओव्हरस्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहेत.त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सातारा ते मुंबईदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना प्रशासनाने वाहनांच्या वेगमर्यादेचे बंधन घालून दिले आहे.मात्र, वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे वारंवार उल्लंघन होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार अपघातांच्या ठिकाणी नव्याने १९ स्पीड लिमिटचे कॅमेरे बसविण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. दरम्यान, सातारा ते वाकड व त्यानंतर एक्स्प्रेसवेवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने खासगी वाहनांसह शासकीय वाहनांवरही भरमसाट दंड आकारला आहे. या ओव्हरस्पीडमध्ये ‘एसटी’चाही समावेश आहे. त्यामुळे नव्याने बसविलेल्या कॅमेऱ्यांच्या ठिकाणांचे पत्रही एसटी विभागाला पाठविले आहे.
कात्रज बोगद्यापासून ५०० मीटर अंतरावर, नरे व नवले पुलापासून एक किलोमीटरवर, वारजे ब्रीजच्या अलीकडे पाचशे मीटरवर, एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर ५०० मीटर, शिरगाव गावापासून पुढे तीन किलोमीटर, ऊर्से गुरुवामन पुलापासून एक किलोमीटर, बाऊर पुलाच्या अलीकडे १०० मीटर व पुढे २०० मीटर, बोरज पुलाच्या अलीकडे शंभर मीटर, मळवली पुलाच्या पुढे पाचशे मीटर, सिंहगड कॉलेजच्या पुढे ५०० मीटर, लोणावळा जुना हायवे टोलनाक्याजवळ, लोणावळा जुना हायवे पूल संपताना, कुणेगाव पुलाजवळ, खंडाळा जुन्या बोगद्याजवळ ५०० मीटर अलीकडे, जुना एस कॉर्नर पुलाच्या अलीकडे, मारुती मंदिराजवळ घाटात, आडोशी बोगद्याच्या अलीकडे पाचशे मीटरवर ओव्हरस्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहेत.