संत मुक्ताई आषाढी वारी सोहळा आता ३४ ऐवजी २४ दिवसांचा
७५० ऐवजी ६०० किमी अंतर चालणार, २ जूनला मूळ मंदिर समाधी स्थळ कोथळीतून होणार प्रस्थान
मुक्ताईनगर ।
हजारो व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या मार्गांत यंदा ४० वर्षांनंतर बदल करण्यात आला आहे. पूर्वी ३४ दिवसांत ७५० किमी अंतर पायी चालून ही पालखी पंढरपुरात दाखल व्हायची. नवीन रचनेत आडमार्ग व फेऱ्याचा प्रवास कमी केल्याने हा सोहळा आता २४ दिवसात महामार्गाने ६०० किमी अंतर चालून आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी पंढरपुरात पोहोचेल. या पालखी सोहळ्याचे संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष ॲड रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे, श्री क्षेत्र मुक्ताईनगर मुळ समाधी स्थान मुक्ताई मंदिराचे व्यवस्थापक ह.भ.प. उद्धव महाराज जुनारे नियोजन करीत असतात.
संत मुक्ताईच्या आषाढी वारी पालखीला ३१२ वर्षांची परंपरा आणि मानाचे स्थान आहे. कारण, मुक्ताईंची पालखी आल्याशिवाय इतर कोणत्याही संतांच्या पालखीला पंढरपुरात प्रवेश मिळत नाही. दरवर्षी हा पालखी सोहळा वैशाख शु. पंचमीला मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथून मुळ समाधी स्थळावरून निघत असतो. पुढे ३४ दिवसांत सहा जिल्हांमधून ७५० किमी पायी प्रवास करून पंढरपुरात दाखल होतो. पण, या पारंपरिक मार्गात पालखीला अनेक वेळा मुख्य मार्ग ( महामार्ग ) सोडून आडमार्गाने, फेऱ्याने प्रवास करावा लागतो. त्यात मुक्कामांची संख्या म्हणजेच प्रवासाचे दिवस वाढतात. शिवाय ग्रामीण भागातील खराब रस्त्यांमुळे अनेकदा पायी दिंडी वेगळी व रथ, पालखीचा मार्ग वेगवेगळा होतो. पालखी मुक्कामाच्या गावात गेल्यानंतर नगर प्रदक्षिणा होते. पण, वारकरी दिवसभर पायी चालून थकल्याने ही प्रदक्षिणा त्रासदायक व्हायची. आता पालखी तळावरच भाविकांना दर्शनासाठी यावे लागेल. जुन्या नियोजनामुळे अडचणी येत होत्या. तसेच खराब रस्त्यांमुळे रथ नेताना अडचणींचा सामना होत होता.
असा होता जुना मार्ग
जुन्या नियोजनात कोथळीतून निघाल्यावर सातोड (ता. मुक्ताईनगर), भालेगाव (ता. मलकापूर), मलकापूर नंतर चौथा मुक्काम शेलापूर असायचा. येथून आडमार्गावरील तालखेड व पाचव्या मुक्कामाला पालखी टाकरखेडला दाखल व्हायची. नंतर तांदलवाडीतून सहावा मुक्काम मोताळा येथे व्हायचा. मात्र, मोताळा आणि शेलापूर हे अंतर फक्त १२ किमी आहे. त्यात पालखीला वेलांटीच्या आकाराचा प्रवास करावा लागायचा. मोताळ्याहून पालखी ७ व्या मुक्कामासाठी बुलडाणा गाठायची. नवीन नियोजनात प्रवासाचे १० दिवस तर अंतर १५० किमीने कमी झाले असून यामुळे पालखी सोहळा २६ जूनला पंढरपुरात होणार दाखल, आडमार्ग, फेन्याचा प्रवास यंदा टळणार आहे.
बुलढाण्यात ७ व्या ऐवजी चौथ्या दिवशी पोहोचणार
» बुलडाणा येथून येडगावला ८ वा, तर चिखलीत नववा मुक्काम व्हायचा. पण येथे पालखीचा मार्ग फेऱ्याच्या दिशेने होता. चिखलीवरून खंडाळा (१० वा), मेरा बुद्रक येथून (११ वा), तर मेरा भरोसा येथे १२ वा मुक्काम व्हायचा. येथे मुख्य मार्ग सोडून डावीकडे दोन दिवस जायचे. रस्त्याअभावी रथ नेण्यात अडचणी होत्या. पाऊस आल्यास गैरसोय व्हायची. पुढे या मुक्कामासाठी देऊळगाव मही येथे जाताना अडचणी यायच्या. नंतर सरळ प्रवास व्हायचा. यंदा पालखी २ जूनला कोथळी येथून निघेल, नवीन मंदिरात विसावा घेऊन दुसऱ्या दिवशी दसरखेड मार्गे मलकापूरला दुसरा मुक्काम, मोताळा तिसरा व चौथा मुक्काम बुलडाणा येथे होईल. जुन्या नियोजनात पालखी बुलडाण्याला ७ व्या दिवशी पोहोचत होती. बुलडाणा येथून येडगाव फाट्यावरून पालखी चिखली (५ वा मुक्काम) येईल. पूर्वी पालखी बेडगावात मुक्कामी असायची. तसेच आता भरोसा गावाऐवजी महामार्गावरील भरोसा फाट्यावर सहावा मुक्काम होईल.
२४ दिवसांचा प्रवास झाल्याने , पालखी सोहळ्याचे स्वरूप संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याप्रमाणे होणार
सर्वात लांबून पालखी सोहळा निघत असल्याने अंतर जास्त होतेच शिवाय ३४ दिवस मुक्कामी प्रवास यामुळे इच्छा असूनही कामांअभावी भाविकांना पालखी सोहळ्यात सहभागी होता येत नव्हते , परंतु यंदा संत मुक्ताई संस्थान ने ऐतिहासिक निर्णय घेतल्याने सुमारे १५० किमी अंतर कमी होत ३४ दिवसांचा मुक्काम ऐवजी केवळ २४ दिवसांचा मुक्कामी प्रवास तसेच सरळ सरळ महामार्गाने पालखी सोहळ्याचे मार्गक्रमण होणार असल्याने हा पालखी सोहळा यंदा भाविकांचे आकर्षण ठरणार असून या पालखी सोहळ्यात खान्देश, मध्य प्रदेश तसेच विदर्भातील भाविक वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संत मुक्ताई पालखी सोहळा हा माऊलींच्या पालखी सोहळ्याप्रमाणे होणार आहे अशी भाविकात चर्चा असून संत मुक्ताई पालखी सोहळ्याच्या मार्गात झालेल्या ऐतिहासिक बदलामुळे पालखीच्या माध्यमातून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी आपसूकच बाहेर पडतील असे चित्र परिसरात दिसून येत आहे.