श्री.विठ्ठलाच्या आषाढी महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत राज्यातील दहा मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनाही मिळणार संधी !
Alert – Language change facility is available on website for all readers. Accordingly, you can read news in English, Gujarati, Hindi, Punjabi, Marathi, Telugu and Urdu languages
शासनाकडून दिंड्याना मिळणा-या २० हजार रुपये अनुदानाचे दिंडी प्रमुखांनी केले स्वागत
अकलूज / सूर्यकांत भिसे – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत आता राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळा प्रमुख व संस्थांचे अध्यक्ष यांना संधी मिळणार असल्याची माहिती श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख ह भ प रवींद्र महाराज हरणे यांनी दिली . दरम्यान शासनाने आषाढी वारीसाठी सोहळ्यात चालणा-या सुमारे १५०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाचे राज्यातील दिंडी प्रमुखांनी स्वागत केले
मुंबई मंत्रालयात शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख ह भ प अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दहा मानाच्या पालखी सोहळा प्रमुख व संस्थांच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . यावेळी मुख्यमंत्र्यांकडे महापुजेची मागणी करण्यात आली .
हरणे म्हणाले , पुर्वी श्री विठ्ठलाच्या पहाटेच्या महापुजेला राज्यातील मानाच्या पालखी सोहळा प्रमुख व संस्थान अध्यक्षांना बोलाविले जायचे . पुढे ती पध्दत बंद करण्यात आली . राज्यातील कानाकोप-यातून शेकडो किलोमिटरची पायपीट करुन लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येतात या वारक-यांना विठुरायाचे साधे दर्शन सुध्दा होत नाही . या वारक-यांचे प्रतिनीधी म्हणून शासनाने राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळा प्रमुख व संस्थान अध्यक्ष यांना महापुजेला निमंत्रीत करावे , आषाढी वारी पालखी सोहळे व शासन यांच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमावा , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या सल्लागार मंडळात संस्थान अध्यक्ष व सोहळा प्रमुखांचा समावेश करावा आदी मागण्या त्यांनी केल्या .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारत्मकता दर्शविली असून आषाढी वारी वारक-यांच्या दृष्टीने सुरक्षित व आनंददायी होण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असे सांगितले .
यावेळी आषाढी वारी मध्ये वारक-यांच्या सोयी सुविधांसाठी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक वारकरी सेनेच्या वतीने ” वारकरी सेवा रथ ” काढण्यात येणार असून त्याद्वारे वारीत वारक-याना आवश्यक त्या सेवा पुरविल्या जाणार असल्याची माहिती या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ह भ प अक्षय महाराज भोसले यांनी दिली .
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ , संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे , सोहळा प्रमुख माणिक मोरे , संत सोपानदेव संस्थानचे अध्यक्ष त्रिगुण महाराज गोसावी , संत मुक्ताबाई सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे , राणु महाराज वासकर आदींसह दिंडी प्रमुख व मानकरी उपस्थित होते.